सांगा जगायचं कसं ? तालुक्याचा उत्तर विभाग विजेविना कासावीस
शित्तूर – वारुण त (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर – वारुण परिसरात गेले आठ -दहा दिवसापासून पावसाने जोर धरल्यापासून विजेचा लपंडाव सुरूच झाला आहे. कधी – कधी चार – चार दिवस विजपुरवठा होतोय पूर्णपणे खंडित. धो – धो कोसळणारा, संततधार पाऊस आणि काळकुट्ट अंधार, सोसाट्याचा वारा अशा भयभीत वातावरणात जनजीवन विस्कळीत झाले असून, महावितरण च्या प्रयत्नांना विजपुरवठा सुरळीत करण्यात मात्र अपयश येत आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तरेला, चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्याना लगतंच असणाऱ्या शित्तूर – वारुण परिसरात पावसाळ्याची चाहूल लागताच विजेचा लपंडाव हा ठरलेलाच असतो. चालू वर्षी मे, जून महिन्यात तर जवळपास आठ -आठ दिवस विजेचा पत्ताच नव्हता. त्यामुळे वीज नाही तर पाणी नाही, दळण – कांडण नाही, अशा अवस्थेत ग्रामीण भागातील, वाडी – वस्तीवरील लोकांनी जगायचं कसं? हा प्रश्न नेहमी येथील जण सामान्यांच्या मधून विचारला जात आहे. तरीही संबंधीत विभाग… काम चालू आहे, ट्रायल घेतोय, डी. ओ गेलाय, अशा प्रकारची उत्तरे देऊन वेळकाडू पणाचे धोरण राबवत आहे. कधी – कधी तर अधिकारी आणि कर्मचारीही ‘नॉट रीचेबल’ होतात, अशा वेळी लाईट कधी येणार? असं आम्ही विचारायचं कोणाला? असा संतप्त सवाल परिसरातून विचारला जात आहे.एखाद्या ग्राहकाचे वीजबिल थकले तर सावकारप्रमाणे त्याच्या दारात उभे राहून, व्याजासहित वसुली करणाऱ्या, वसुली पथक राबवणाऱ्या महावितरण च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्राहकाला उत्तम प्रकारे सेवा पण देणे गरजेचे आहे, याचा जणू विसरच पडलेला दिसून येतोय.
वीज नसल्यास ग्रामीण भागात दिवा – बत्ती अथवा कंदिलाचा प्रकाशासाठी उपयोग केला जात असे. परंतु रेशन दुकानावर मिळणारे रॉकेल बंद झाल्यामुळे दिवा – बत्तीला अथवा कंदिलासाठी इंधन कुठून आणायचे, असा मोठा पेच निर्माण होत आहे.
शित्तूर – वारुण, शिराळे – वारुण, उखळू, उदगिरी, खेडे, सोंडोली तसेच कानासा खोऱ्यातील कांडवण, मालगाव, जांबूर, थावडे, विरळे, पळसावडे आणि डोंगर दरीत असणाऱ्या वाडया – वस्त्या चांदोली राष्ट्रीय उद्याना लगत असल्यामुळे रात्री -अपरात्री एखाद्या हिंस्त्र प्राण्याकडून अंधाराचा फायदा घेऊन पाळीव प्राणी अथवा माणसांवर हल्ला करण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे कायमस्वरूपी विजपुरवठा व्हावा अशी मागणी परिसरातून होत आहे.
चौकट आमचे लोक कायमस्वरूपी कार्यरत आहेत.आम्ही काय बसलेलो नाही, त्यामुळे वीज नाही किंवा काय अशी चुकीची माहिती तुम्ही आम्हाला सांगू नये. आमच्या सब – स्टेशन ला सगळे रेकॉर्ड आहे. कोणत्या भागात किती दिवस वीज नाही, याची माहिती आमच्याकडे पण आहे.-
पवन माने ( सहाय्यक अभियंता महावितरण. भेडसगाव)