राजकीय

तालुक्यातील विजयराव, नामदेवराव खोत शिवसेनेच्या वेशीवर

बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील राजकारणात नवे स्थित्यंतर येणार असून, तालुक्यातील जनसुराज्य शक्ती पक्षाला खिंडार पडणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. तालुक्यातील राजकारणात गायकवाड गट व सरुडकर गट हे मुख्य प्रवाहात होते. परंतु कालांतराने जनसुराज्यशक्ती व शिवसेना या दोन पक्षाने आपले स्थान केवळ निश्चितच केले नाही, तर सत्तेत आणले. प्रथम जनसुराज्य शक्ती ने आपले अस्तित्व दाखवून दिले. परंतु त्यानंतर मात्र तालुक्याच्या स्वाभिमानाचा मुद्दा राजकीय पटलावर आणून शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी सत्ता हस्तगत केली.
असे असतानाही माजी मंत्री विनय कोरे यांनी तालुक्यात आपले स्थान कर्णसिंह गायकवाड गटाच्या सहाय्याने आजही कायम ठेवले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनसुराज्य ने आपले स्थान निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान जिल्हापरिषदेचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर व तालुक्याचे जनसुराज्य चे अध्यक्ष नामदेवराव खोत यांच्यात अढी निर्माण झाली. याचा परिणाम थेट गट सोडण्यापर्यंत गेला आहे. शाहुवाडी पंचायत समिती सदस्य विजयराव खोत यांनी शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर गटाशी संधान साधत सत्यजित पाटील गटात प्रवेश करण्याच्या वेशीपर्यंत पोहचले आहेत.
याचा परिणाम जनसुराज्य शक्ती पक्षाला निश्चितच भोगावा लागणार आहे. कारण लवकरच लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. मागील विधानसभेत सत्यजित पाटील थोड्या फरकाने आमदार झाले होते. याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे गटाचे मतदार वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे, यात काही गैर नाही. परंतु जनसुराज्य पक्षाला मात्र हा राजकीय प्रवेश जिव्हारी लागल्याशिवाय रहाणार नाही. हा राजकीय प्रवेश निश्चित झाला असून ,लवकरच वेळ निश्चित होईल.
याबाबत जनसुराज्य चे तालुक्यातील नेतृत्व सर्जेराव पाटील पेरीडकर यावर काय उपाय काढणार ,याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!