चौकशीला घाबरून विरोधक भाजप च्या वळचणीला : आम.सत्यजित पाटील सरुडकर (आबा )
मलकापूर : एखाद्या पक्षाचा प्रवक्ता जेंव्हा त्याच पक्षाच्या संस्थेच्या सचिवाच्या चौकशीची मागणी करतो, तेंव्हा निश्चितच त्या संस्थेत काही काळं बेरं असलं पाहिजे. तेंव्हा निश्चितच त्या संस्थेची सीआयडी मार्फत चौकशी व्हावी, अशी मी मागणी करत आहे. अशा प्रकारची टीका नाव न घेता माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी केली.. आपल्या संस्थेची चौकशी लागू नये म्हणून अगोदरच आमचे विरोधक भाजप च्या वळचणीला जावून बसले आहेत. असेही आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी नाव न घेता माजी आमदार विनय कोरे यांच्यावर टीका केली.
कडवे पैकी वरीलगाव इथं जनसुराज्य पक्षाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव खोत ,व शाहुवाडी पंचायत समितीचे सदस्य विजयराव खोत, संजय खोत यांनी जनसुराज्य पक्षाला सोडचिठ्ठी देवून, शिवसेना व मानसिंगराव गायकवाड दादा या युतीच्या गटात रीतसर प्रवेश केला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर होते. यावेळी नामदेवराव खोत यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याने शाहुवाडी च्या पश्चिमेला जनसुराज्य पक्षाला खिंडार पडले आहे. कारण नामदेवराव खोत यांची एकेकाळी मिनी आमदार म्हणून ख्याती होती. त्यांचा राजकीय अनुभव गाढा आहे. याचा सरुडकर गटाला निश्चितच फायदा झाल्याशिवाय रहाणार नाही.
यावेळी आमदार सत्यजित पाटील पुढे म्हणाले कि, नामदेवराव खोत हे एकेकाळी संजयदादा गटाचे खंदे समर्थक होते. तेंव्हापासून त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला माहित आहे. त्यांनी आमच्या गटात प्रवेश केला आहे. त्यांना तसेच त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमच्याकडे सन्मानाची वागणूक मिळेल.
यावेळी मानसिंगराव गायकवाड दादा म्हणाले कि, नामदेव आबांचे आणि आमचे ऋणानुबंध खूप अगोदरचे आहेत. आजचा नामदेव आबांचा प्रवेश एक वर्ष अगोदर झाला असता, तर बरं झालं असतं. तरीसुद्धा आमच्या सोबत आले ,हे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचे आमच्याकडून निश्चितच स्वागत आहे. यावेळी उदय साखर कारखाना संदर्भात बोलताना मानसिंगदादा म्हणाले कि, सध्या कारखान्यावर एक रुपयाचे देखील कर्ज नाही. तसेच कारखान्याचा डीस्टीलरी विभाग लवकरच सुरु होईल. यामुळे आणखी तरुण आपण नोकरीला लावू शकू. असेही मानसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी नामदेवराव खोत म्हणाले कि, मी आजवर सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून काम करत आलो आहे, सामान्य जनतेची कामे होणे, हीच माझी अपेक्षा आहे. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मी संजयदादांच्या माध्यमातून नाती निर्माण करण्याचे काम केले आहे. पन्हाळ्यासारखा शाहुवाडी तालुका समृद्ध करण्याचा माझा मानस होता, म्हणून जनसुराज्य पक्षात गेलो होतो. सुमारे १८ हजार मते मी जनसुराज्य पक्षाला मिळवून दिली होती. परंतु नेत्यांनी सुडाचे राजकारण केले. मला नावापुरताच तालुका अध्यक्ष पद दिले. पण मी मात्र प्रामाणिकपणे काम केले. आमदारकी असतानाही, ज्यांची मते कमी होतात.यावरुन त्यांची क्रियाशीलता लक्षात येते. म्हणूनच सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून मी हा प्रवेश करत आहे.
यावेळी रणवीरसिंह गायकवाड म्हणाले कि, आमदार सत्यजित आबांना केवळ आमदार नव्हे,तर मंत्री करण्याचे आव्हान मी तरुणांना करत आहे. नामदेवराव आबा यांचे आमचे घरोब्याचे संबंध आहेत. भविष्यात याचाही चांगला उपयोग युतीसाठी होणार आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले कि,त्यागाचे प्रतिक असलेला भगवा तुमच्या खांद्यावर दिला आहे. भविष्यात विधानसभेवर भगवा फडकणारच आहे, तेंव्हा आबांना मंत्रिपद निश्चितच मिळेल. आपले आमदार सत्यजित पाटील हे लोकप्रिय आमदार आहेत. नेतृत्व आणि कर्तुत्व हे आबांकडून शिकावे, असेही जाधव यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी नामदेवराव खोत व त्यांच्यासहित गटात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.
यावेळी सरपंच संजय लाळे, शिवाजी पाटील, अमरसिंह पाटील,बळवंत यादव, दगडू पाटील पेरीडकर शाहीर आदींनी मनोगते व्यक्त केलीत.
यावेळी ज्योतीर्लीग एंटर्प्रायजेस चे आनंदराव भेडसे यांची शिवसेना शिराळा -वाळवा विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदी निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अनेक मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी हारतुरे यांच्या ऐवजी एक रोप देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमारे एक हजर पाचशे रोपांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील बापू, विजयराव बोरगे , आकांक्षा पाटील, नामदेवराव पाटील सावेकर, डॉ. स्नेह जाधव, दिलीप पाटील, सुरेशराव गायकवाड, गामाजी ठमके, दत्ता पोवार, उपजिल्हाप्रमुख नामदेवराव गिरी, उद्योगपती धनंजय पाटील, जालिंदर पाटील रेठरेकर, अश्विनी पाटील, सौ.सुनिता पारले, सुरेश पारले, पंडितराव शेळके, पांडुरंग केसरे, ए. डी.पाटील, सुधाकर पाटील व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.