प्रयत्न आणि ध्येय निश्चिती मुळेच परिवर्तनाची त्सुनामी- श्री आशिष पाटील साळशीकर
बांबवडे : प्रयत्नांची पराकाष्ठा ,त्याग, ध्येयनिश्चिती आणि पुस्तकांची साथ या बरोबरच आई-वडिलांची प्रेरणा हीच माझ्या यशाची सूत्रे आहेत. यामुळेच माझ्या आयुष्यात परिवर्तनाची त्सुनामी आली, आणि यश आपोआप पदरात पडलं. असे मत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले आशिष पाटील यांनी साळशी गावाच्या नागरी सत्काराला उत्तर देताना आपली कृतज्ञता व्यक्त केली.

साळशी तालुका शाहुवाडी इथं, येथील भूमिपुत्र असलेल्या आशिष अशोकराव पाटील यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळविल्याबद्दल त्यांचा साळशी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉ. विनय कोरे उपस्थित होते. यावेळी बांबवडे ते साळशी ओपन जीप मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

या नागरी सत्कार प्रसंगी आशिष पाटील आपल्या सत्काराला कृतज्ञता व्यक्त करताना बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, ग्रामीण भागातील युवकांमध्ये सामर्थ्य ठासून भरलेले असते. तिथे गरज असते,ती आई-वडिलांच्या सकारात्मक साथीची, जी मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. यातूनच आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करण्याची जिद्द वाढीस लागते. यामुळेच कोरोना काळात मी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेवून, अभ्यास केला.त्यात सातत्य ठेवले. त्याला पुस्तकांची जोड दिली. वर्तमानपत्रांचे वाचन हे देखील त्या अभ्यासाचा भाग होता. म्हणूनच माझ्या आयुष्यात परिवर्तन झाले, आणि मी यशस्वी झालो. भविष्यात या साळशी गावाने जो सत्कार केला , त्याला प्रामाणिक राहून, या गावासाठी शक्य ते करण्याचा माझा मानस राहील.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार डॉ. विनय कोरे म्हणाले कि, ग्रामीण भागात कर्तुत्व असून, जिद्द ठासून भरलेली असते. त्यामुळेच आपल्या भागातील मुले यशाचे शिखर गाठताना दिसतात. यासाठी आपली सामाजिक जबाबदारी असते, कि त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. यासाठी साळशी मध्ये आभ्यासिकेसाठी १० लाखाचा निधी मी जाहीर करीत आहे. ज्याचा उपयोग स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल. असे आश्वासन आमदार कोरे यांनी दिले.