वारणा उजवा कालव्यातील बांध हटवा – ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी
तुरुकवाडी ( कृष्णा कांबळे ) : नेर्ले ( वारणा ) तालुका शाहुवाडी इथं वारणा उजवा कालव्यावर घालण्यात आलेला बांध तातडीने काढण्यात यावा, अन्यथा होणाऱ्या वित्त व जीवित हानीस संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा नेर्ले ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी वारणा उजवा व डावा कालवा क्र. १ चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढे नमूद केले आहे कि, दर पंधरवड्यास वारणा धरणातून शिराळा तालुक्यातील वारणा डावा कालव्या द्वारे शाहुवाडी तालुक्यातील वारणा उजव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी प्रवाहित केले जाते. वारणा उजवा कालवा गोंडोली ते सरूड १६ कि.मी. पर्यंत प्रवाहित असतो. मात्र भेडसगाव येथील शेतकरी तुकाराम भोसले यांनी नेर्ले हद्दीत कालव्यात बांध घातल्याने कालवा प्रवाहित होत नाही. परिणामी पावसाळ्यात डोंगर – दऱ्यातील ओढे , नाले प्रवाहित होवून, संपूर्ण भागातील पाणी कालव्यात उतरते. त्यामुळे कालवा अधिक प्रवाहित होतो. परंतु बांध घातल्यामुळे सदर चे पाणी प्रवाहित न झाल्यास कालव्याला भगदाड पडू शकते. शेती, मनुष्य, पाळीव दुभत्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
तरी संबंधित विभागाने गांभीर्य ओळखून पावसाळ्यापूर्वी कालव्यातील बांध हटविण्याची मागणी निवेदनाद्वारे होत आहे. निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.