शाहुवाडी पोलिसांचा ढिसाळ कारभार : २४ तासांपर्यंत दप्तर दिरंगाई कि, उत्तर दिरंगाई ?
बांबवडे : शाहुवाडी पोलीस ठाण्याकडून गुन्ह्यांची माहिती देण्यात दिरंगाई केली जात असून, यामध्ये पोलिसांचा ढिसाळ कारभार समोर येताना दिसत आहे.

घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतर सुद्धा रात्री ७ वाजेपर्यंत गुन्हा नोंद होत नाही. किंबहुना गुन्हा नोंद झाला असला तरीही त्याची माहिती किंवा त्याबाबत चे उत्तर देण्यास शाहुवाडी पोलीस का दिरंगाई करीत आहे ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप पत्रकरांना मिळत नाही. याबाबत पोलीस निरीक्षक विजय पाटील यांना वेळोवेळी विचारले असता,देखील समाधानकारक उत्तर पत्रकारांना मिळत नाही. याचे गौडबंगाल काय? हा प्रश्न आहे.

घटनेची नोंद उशिरा करून ,किंवा वेळेत न करणे, हा सुद्धा दप्तर दिरंगाई चा भाग होवू शकतो. तसेच घटना घडणे, आणि नोंद, यामध्ये खूप वेळ का जातो ? कि, जाणूनबुजून नोंद उशिरा करण्यामध्ये पोलिसांचे कोणते हित दडले आहे ? असे अनेक प्रश्न शाहुवाडी तालुक्यातील पत्रकारांना पडत आहेत.

कालच घडलेली घटना रविवार दि.१५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता घडूनही दि.१६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत अधिकृत माहिती पत्रकारांना का दिली जात नाही. अद्याप नोंद झाली नाही, या कारणा अडून पोलिसांना नेमके काय साधायचे आहे ? याचे उत्तर अद्याप अनुत्तरीत आहे. याबाबत शाहुवाडी तालुक्यातील पत्रकार पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान शाहुवाडी पोलीस ठाण्याचा दूरध्वनी अद्यापही बंदच आहे. याबाबत पोलीस खाते काय प्रयत्न करताहेत ,हा प्रश्नच आहे. जर पोलीस खात्यासारख्या खात्याकडे दूरध्वनी नसेल, तर हे शाहुवाडी तालुक्याचे हे दुर्दैव आहे. याबाबत शाहुवाडी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो असता,त्यानाही याबाबत काही गांभीर्य आहे, असे वाटले नाही.