Recentसामाजिक

दुःखापर्यंत येते ती आई,आणि वेदना पदरात घेते ती माई : सिंधुताई सपकाळ

बांबवडे ; स्वतः जगा,पुढे जा,पण पुढे गेल्यानंतर मागे पहायला विसरू नका. सात कप्प्यांच्या आतील सौंदर्य बाहेर दाखवू नका,कारण ती आपल्या देशाची संस्कृती नाही. माती नीती आणि संस्कृती जपायला शिका. असे अनेक उपदेश वेदना आपल्या पदरात घेवून दुःखाच्या शोधात निघालेल्या माईनी ,आपल्या व्याख्यानात केले.
बांबवडे तालुका शाहुवाडी इथं आदरणीय सिंधुताई सपकाळ ( माई ) यांचे व्याख्यान गुरुवार दि.२६ एप्रील रोजी सायंकाळी ८ वाजता संपन्न झाले.या व्याख्यानाचे आयोजन ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने करण्यात आले होते.
. अशाच माईंचे म्हणजेच सिंधुताई सपकाळ यांचे हृदयस्पर्शी व्याख्यान संपन्न झाले. आपल्या या व्याख्यानात माईंनी समाजाच्या विविध पैलूंना स्पर्श करत उपस्थितांच्या अंत:करणाचा ठाव घेतला. आई ची भूमिका मांडताना नवऱ्याची भूमिका समजावून घेवून,एक पत्नी त्याच्या उणीवांवर मायेचा लेप कसा लावते, हे त्यांनी पाहुण्यांना चहा करण्यासाठी दुध नसतानाही तारेवरची कसरत करत कशी वेळ निभावून नेली हे दाखवले. पुरुषी स्वभावाला औषध म्हणजे प्रेम असते, तर पत्नी कशी आपला संसार सांभाळते,अशा पत्नीला फक्त जिव्हाळ्याच्या दोन शब्दांचीच गरज असते,तेंव्हा पत्नीचे देखील कौतुक करण्यास नवऱ्यानी विसरू नका,असा कानमंत्र माईंनी दिला. सध्याच्या आधुनिक युगात स्त्री देहाचे प्रदर्शन न मांडता,सात कप्प्यातील आपली संस्कृती झाकून ठेवा,असा उपदेश,त्यांनी युवती,व महिलांना केला. सात समुद्रापलीकडे जावूनही महाराष्ट्राची नऊ वारी जगात भारी ,हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. दारात कोणी महिला भिक मागण्यासाठी आल्यास तिला केवळ पाणी देवून भागवू नका,तर भाकरीचा तुकडा सुद्धा खायला द्या, असे औदार्य देखील माईंनी दाखवायला सांगितले. स्वतः च्या आयुष्याचा प्रपंच उघडा करताना दुःखाला घाबरू नका ,त्याला आपला सोबती बनवा,हेच खरे जीवन आहे मी जगले, तर तुम्हीही जगा ,असेही सांगण्यास माई विसरल्या नाहीत.
हजारो अनाथ मुलांची आई होण्यासाठी स्वतःच्या बाळाचा त्याग करणारी माई आज उपस्थितांना पहायला मिळाल्या. कोणाला माफ करण्यात किती समाधान असते.तेही त्यांनी स्वतःच्या पतीला माफ करून ,स्त्री क्षणाची पत्नी ,व अनंत काळाची माता असते, हे देखील दाखवून दिले.
एवढे मोठे सामाजिक कार्य करणाऱ्या माईंच्या संस्थेला अद्याप अनुदान मिळत नाही,ह्यासारखे दूसरे आश्चर्य ते कोणते ? जगासाठी राबणाऱ्या ७० वर्षीय माईंना साडेसातशे पुरस्कार मिळाले.राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला,पण या माउलीचे मुळचे दुखणे मात्र शासनाला कधीच दिसले नाही. हजारो कोटींची स्मारके उभारण्यापेक्षा अनाथांचे संसार उभे करायला निधी मिळाला,तर ते खरे माणुसकीचे स्मारक होईल. यासाठी सर्व सामान्य जनतेने आवाज उठवणे गरजेचे आहे. कारण जनतेच्या आवाजात मोठी ताकद असते. ती दाखवून देण्याची आज वेळ आली आहे. तरच आपण माईंच्या कार्याला हातभार लावल्यासारखे होईल.
यावेळी युवा नेते रणवीरसिंग गायकवाड, जि.प.सदस्य विजय बोरगे पै.,गावचे माजी सरपंच विष्णू यादव, विद्यमान सरपंच सागर कांबळे,उपसरपंच सयाजी निकम, सदस्य सुरेश नारकर, अभयसिंह चौगुले,इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि परिसरातील असंख्य श्रोते उपस्थित होते.यावेळी सूत्र संचालन आणि आभार अल्लाबक्ष मुल्ला यांनी केले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!