२५ मे पासून शेतकरी निघाले संपावर
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : सोमवारी दि.२२ मे रोजी पुणतांबे इथं झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत २५ मे पासून ३१ मे पर्यत शेतकरी संपावर जाणार असल्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला राज्यातील बहुतांश शेतकरी संघटना सामील झाल्या होत्या.
शेतकऱ्यांचा ७/१२ कर्ज मुक्त करा, शेती मालाला हमी भाव, कृषीसाठी मोफत वीज पुरवठा, शेतकऱ्याला पेन्शन योजना, डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा, दुधाला प्रति लिटर ५० रुपये दर , ठिबक व तुषार सिंचनसाठी १०० टक्के अनुदान या मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. २५ मे ते ३१ मे या काळात प्रत्येक तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे ‘ धरणे आंदोलन ‘ होणार आहे.
सर्व जिल्हा व तालुक्याची शहरे यांना दूध, भाजीपाला, फळे, अन्नधान्य, अंडी, मांस यांचा पुरवठा येत्या १ जूनपासून बंद करायचा. मुंबईला जाणारे सर्व ६० रस्ते ठिकठिकाणी अडवायचे, त्यासाठी एक हजार ट्रॅक्टर रस्त्यात उभे करायचे अशी व्यूहरचना या बैठकीत आखण्यात आल्याचे समजते.
या बैठकीला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, स्वाभिमान शेतकरी संघटना, जयाजीराव सूर्यवंशी, सीमा नरोडे, पुण्याचे शांताराम कुंजीर, संदीप गिप्ते, राजाभाऊ देशमुख, सचिन नलावडे, विवेक पाटील, सतीश कानवडे आणि पुणतांबे येथील सुहास वहाडणे, धनंजय जाधव, धनंजय धोर्डे या शेतकऱ्यांसह २०० निवडक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.