मलकापूर आगाराची एसटी च्या फेऱ्यांची ऐशी तैशी …?
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील अनेक मार्गावरच्या एसटी बस गाड्या बंद झाल्या आहेत, तर अनेक फेऱ्या वेळेत येत नाहीत. यामुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये सुधारणा न झाल्यास, उग्र आंदोलन करण्याची वेळ येईल, अशी चर्चा जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
शाहुवाडी तालुक्यात एसटी बस गाड्यांच्या वेळापत्रकाची बोंबाबोंब झाली असून, अनेक मार्गिकेवरच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. बांबवडे ते सातवे सावर्डे मार्गे कोडोली हि एसटी दिवसातून चार फेऱ्या करीत होती. या फेऱ्यांमधून उत्पन्न हि चांगले मिळत होते. परंतु एसटी बस वरिष्ठ कार्यालयाकडून उपलब्ध होत नाहीत. या कारणास्तव या मार्गीकेवर च्या फेऱ्या बंद केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर कोल्हापूर शित्तूर-वारुण,तसेच कांडवण ह्या बस दिवसातून सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा फक्त दोन फेऱ्या करत होत्या. त्या फेऱ्या देखील वेळेवर येत नसल्याची जनतेतून तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. हि गाडी कानसा खोऱ्यात मलकापूर आगाराच्यावतीने एवढीच गाडी होती. परंतु शिराळा आगारातील बस मात्र वेळेवर येतात. तर मलकापूर आगाराला काय हरकत आहे. असा प्रश्न सुद्धा जनतेतून विचारला जात आहे.
यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा सर्वाधिक त्रास होत आहे. एवढेच नव्हे, तर एसटी च्या कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर कामाला जाण्यास यामुळे विलंब होताना दिसत आहे. फक्त एसटी कर्मचारी असल्याने हि मंडळी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसत आहेत.
याबाबत मलकापूर आगार व्यवस्थापक श्री गोधे यांच्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठ कार्यालयाकडून बस ची अपुरी संख्या दिली जात असल्याने या फेऱ्या बंद केल्या आहेत. अशी उत्तरे आगार प्रमुखांनी दिली. परंतु हि उत्तरे संयुक्तिक नसून, या अगोदर उत्पन्न मिळत नाही, म्हणून बस फेऱ्या सुरु नव्हत्या, तसेच रस्ते चांगले नसल्याच्या कारणामुळे ह्या फेऱ्या बंद होत्या. परंतु हि दोन्ही कारणे दुरुस्त झाली असून,आत्ता वरिष्ठ कार्यालयाकडून बस संख्या अपुरी असल्याची कारणे देवून, बस फेऱ्या बंद करण्याचे षड्यंत्र सुरु झाले आहे.
याकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधी लक्ष घालणार आहेत कि, नाहीत, असा प्रश्न सर्व सामान्य जनतेतून विचारला जात आहे.