सावधान ! सह्याद्रीला सुरुंग लागतोय ?…
बांबवडे : एकीकडे शतकोटी वृक्ष लागवडीचे आवाहन करायचे ,आणि दुसरीकडे पर्यावरण नष्ट होईल असे बेत आखायचे, असा घाट शाहुवाडी तालुक्यात घातला जातोय. पुन्हा एकदा सह्याद्रीला सुरुंग लागणार आहे. ११० हेक्टर वनजमिनी मध्ये खाणकामाचा घाट शासन घालत आहे. आपला सह्याद्री आणि त्याचे पर्यावरण खऱ्या अर्थाने रोखायचे असेल तर, उद्या दि.२७ ऑक्टोबर रोजीघुंगुर इथं होणाऱ्या लोक सुनावणीला शाहुवाडी तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून या प्रकल्पाला विरोध दर्शवा,जेणेकरून कुठेतरी शिल्लक असलेले पर्यावरण राखता येईल.
शासनाने एकीकडे शतकोटी वृक्षलागवड करण्याचे आवाहन करायचे ,आणि दुसरीकडे मुळात असलेली वनसंपदा नष्ट करण्यास परवानगी द्यायची, असे दुटप्पी धोरण वनखात्याने आरंभिले आहे. शाहुवाडी तालुक्याचा पश्चिम भाग बॉक्साईट च्या उत्खननाच्या माध्यमातून रिकामा करत आणला आहे. यातून मुठभर लोक गब्बर झाले. आणि अवघा तालुका बोडका झाला. अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे वन खात्याने काही परदेशी सिमेंट कंपन्यांना आवश्यक असणारे लॅटेराईट खनिज उत्खननास परवानगी दिली आहे. याबाबत लोकप्रतिनिधी अद्याप गप्प का? हा प्रश्न सुद्धा उपस्थित होवू लागला आहे.
यासाठी ह्या सह्याद्रीला सुरुंग लागण्या अगोदर इथल्या मावळ्यांनी सावध होणे,आणि या प्रकल्पास विरोध दर्शवणे हि काळाची गरज आहे. यासाठी घुंगुर,आंबर्डे,परखंदळे येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवून आपला सह्याद्री वाचवू या.