कर्णसिंह यांचा जनसुराज्य प्रवेश भविष्याला समोर ठेवून ?
बांबवडे : स्व. आमदार संजयसिंह गायकवाड यांचे चिरंजीव व गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज शक्ती पक्षामध्ये थेट प्रवेश केला आहे. यामुळे कर्णसिंह यांच्यावर जनसुराज्य मध्ये होणाऱ्या चर्चांवर पूर्ण विराम मिळाला आहे.
कर्णसिंह गायकवाड हे मूळ कॉंग्रेस चे सहकारी होते. या अगोदर त्यांच्या मातोश्री श्रीमती संजीवानिदेवी गायकवाड, त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्रीदेवी गायकवाड यांनी सुद्धा कॉंग्रेस पक्षातून आपली उमेदवारी देवून, त्या निवडून सुद्धा आल्या होत्या. त्यानंतर करणसिंह यांनी सुद्धा कॉंग्रेस पक्षातून आपली उमेदवारी जाहीर केली होती. त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विद्यमान आमदार डॉ. विनय कोरे यांना पाठींबा दर्शविला होता. त्यामुळे जनसुराज्य पक्षाला मोठा पाठींबा मिळाला, आणि त्यांच्या आमदारकीवर शिक्का मोर्तब झाला.
याची परतफेड करीत जनसुराज्य पक्षाने त्यांना गोकुळ चे संचालक बनण्यास मदत केली. हे जरी खरे असले तरी, जनसुराज्य मध्ये अंतर्गत याबाबत कुरबुरी होत्या. जे पक्षाचे सदस्य नाहीत, त्यांना संचालक केले जाते. ह्या सर्वच कुरबुरींना पूर्णविराम देण्यासाठी कर्णसिंह यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाला असून, कुरबुरी करणार्यांना हा थेट चाप बसला आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात कॉंग्रेस पक्षाची बाजू तितकीशी भक्कम नाही. त्यामुळे राजकारणात राहायचे असेल, तर सत्तेत सहभागी होणे हि काळाची गरज आहे. या अनुषंगाने कर्णसिंह यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला असावा. तसेच भविष्यात मतदारसंघ विभागला गेला, तर त्यातून आपल्यासाठी विधानसभा जागा मिळावी, असा देखील त्यांचा मानस असावा, अशी चर्चा सर्वसामान्य जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
