राजकीयसामाजिक

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी न झाल्यास आंदोलन तीव्र करणार  – दत्ता पोवार, यशवंत पाटील

शाहुवाडी : शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. भांडवलदारांचे लांगुलचालन बंद करून शेतकऱ्यांचा  सातबारा संपूर्ण पणे कर्जमाफी देवून कोरा केला पाहिजे, अन्यथा शिवसेनेच्या वतीने भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे शाहुवाडी तालुका प्रमुख दत्ता पोवार व माजी संपर्क प्रमुख यशवंत पाटील यांनी दिला आहे.

शेतकऱ्याच्या शेतमालाला  हमीभाव मिळत नसल्याच्या कारणाने शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे.केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ शाहुवाडी तहसील कार्यालयाच्या दारात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण शिवसेना उबाठा गटाच्यावतीने करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शाहुवाडी तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी केले.

यावेळी श्री पोवार पुढे म्हणाले कि, निवडणुकीच्या तोंडावर राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच शेतमालाला हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. यापैकी अद्याप काहीच झाले नाही.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे माजी संपर्क प्रमुख यशवंत पाटील म्हणाले कि, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. राज्यात शेतकऱ्याच्या कांद्याला ५० पैसे भाव मिळू लागल्याने राज्यशासन नेमके काय करतेय ? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे. यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी मात्र  बांधाच्या बाहेरच राहिली. एकीकडे खते आणि कीटकनाशके यांचे भाव १८०० रुपयांवरून २२००/- रुपयांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.

यावेळी शिवसेना उबाठा गटाचे  योगेश कुलकर्णी, उपतालुका प्रमुख निवास कदम, युवसेना तालुका प्रमुख जयसिंग डाकवे, विभागप्रमुख हेमंत पाटील, शाखा प्रमुख प्रवीण पाटील, लक्ष्मण भेडसे, बापू लाळे व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी उपोषण स्थळाला कॉम्रेड भाई भारत पाटील, पंचायत समिती सदस्या डॉ. धनश्री पाटील, आबासाहेब पाटील, राजराम मगदूम यांच्यासह मान्यवर मंडळींनी भेट दिली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!