वन विभाग गेंड्याच्या कातडीचे आहे का ?-भाई भरत पाटील
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नागरी वस्ती नजीक असलेल्या शेड जवळ पाळीव कुत्र्यावर हल्ला केला, आणि बांबवडे गावात दहशत पसरली. असे जरी असले तरी, आपले वन विभाग मात्र सुस्तच आहे. नेमके हे खातं संवेदनशील आहे का ? कि, या खात्याची कातडी गेंड्यांच्या कातडी सारखी आहे ? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. असे मत भाई भारत पाटील शेकाप चे नेते यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
शाहुवाडी तालुक्यातील वन्य प्राण्यांनी घातलेल्या हैदोस बाबत सामाजिक कार्यकर्ते भाई भारत पाटील यांनी वन क्षेत्र अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि त्यांच्या जीवितास असलेला धोका, याबाबत कैफियत मांडली असता, सर्व बिबटे जंगलात गेलेत, असे उत्तर त्यांना वन अधिकाऱ्यांनी दिले. हे अशोभनीय आहे.
बिबटे जर जंगलात गेले, तर मग हे प्राणी कोण आहेत ? याचं उत्तर वन अधिकारी देतील का ?
तालुक्यातील अनेक गावात बिबटे, रानडुक्कर, गवे असल्या प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. शिरगाव, उचत आदी गावात डुकरांनी रताळी, भुईमुग आदि पिकांची नासाडी केली आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने उभारीस आणलेली पिके भुइसपाट होत आहेत. बिबट्यांनी कुत्री, शेळ्या, मेंढ्यांचा सुपडा पाडला आहे. समोर दिसणारी शेळी, मेंढी वेगळी, तर गायब होणाऱ्या शेळ्या,मेंढ्यांचं काय ? त्यांचा पंचनामा सुद्धा होत नाही. कारण त्यांचं शव मिळत नाही. म्हणून त्यांचे पंचनामे नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई नाही. यामध्ये शेतकऱ्यांचा दोष काय ? याबाबत वन खाते कधी विचार करणार ? हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. बांबवडे येथील वस्तीवरील पाळीव कुत्र्याला भरदिवसा बिबट्याने नेले, हि बाब अतिशय गंभीर आहे. कारण या काळात शेतकरी दिवसभर भांगालनीच्या व्यापात असतो. तो दिवसा आपल्या शेतात काम करीत असतो, अशावेळी बिबट्याने हल्ला केल्यास करायचे काय ?
यावर वन विभाग नेमकं काय उत्तर देणार हे सुद्धा महत्वाचे आहे.
