‘गोगवे ‘ चं बाळ ‘कर्मभूमी ‘ कडून ‘जन्मभूमी ‘कडे रवाना : शहीद श्रावण माने यांचं पार्थिव दाखल
बांबवडे : शहीद श्रावण माने यांच्या पार्थिवाच्या आगमनासाठी अवघा तालुका नव्हे, तर जिल्हा बांबवडे इथं वाट पहात होता. रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी गर्दी केली होती. कारण भारतमातेचा लाडका जवान तिरंग्यात लपेटून कर्मभूमीतून आपल्या जन्मभूमीकडे येत होता. अवघा जनसागर हुंदका आवरून वाट पहात होता. आणि ‘वंदे मातरम् ‘ च्या घोषणा आसमंतात भिरभिरत होत्या. सकाळी आठ वाजल्यापासून जनसागर या वीराची वाट पहात होता.
तेवढ्यात सह्याद्रीचा लाडका वीर तिरंग्यात लपेटून आपल्या मातृभूमीला भेटण्यासाठी आला. एकच नाद आसमंतात दुमदुमला ‘ भारत माता कि जय ‘ आणि अवघी तरुणाई शिरशिरली.
अनेक तरुण मंडळांनी मानवंदना देत फ्लेक्झ लावले होते. महिला मंडळींनी देखील फुलांची बरसात, त्यांच्या येणाऱ्या पावलांवर केली होती. लष्करी इतमामात शाहुवाडीच्या लाडक्या वीराचं आगमन झालं होतं. लष्करी ट्रक मध्ये तिरंग्यात निवांत झालेलं गोगवे मातृभूमीचं हे ‘बाळ ‘ अंतर्मनानं हा देखावा पहात होतं. लष्करी ट्रक च्या मागे पळणारे लष्करी अधिकारी, पोलीस कर्मचारी, आणि त्यामागे अवघी तरुणाई. हा सोहळा नशीबवंतांच्यांच भाळी लिहिला जातो. तो बहुमान मिळवायला देखील सर्वस्वाचा त्याग करायला लागतो, आणि तो केला आहे, बाळकू माने यांच्या कुटुंबीयांनी .
यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हापोलीसप्रमुख, तालुक्याचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर, आमदार अमल महाडिक , रणवीर सिंग गायकवाड ,आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील बापू, माजी उपसभापती नामदेवराव पाटील सावेकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नामदेव गिरी, माजी उपसभापती महादेवराव पाटील साळशीकर , भारत पाटील भाऊ वडगावकर,व पंचक्रोशीतील सर्व मित्र मंडळे, ग्रामस्थ उपस्थित होते.