“ गोकुळ ” च्या माध्यमातून शाहुवाडी ची समीकरणे बदलणार ?
बांबवडे : कोल्हापूर जिल्ह दुध संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात नवी राजकीय समीकरणे घडू लागली आहेत.एकीकडे गोकुळ ची निवडणूक बिनविरोध करायची असे दिसत असले, तरी अनेक महारथींनी आपले ठराव सुरक्षित केल्याचे दिसत आहेत. हे जरी जिल्ह्याचे राजकारण असले,तरी तालुक्यातील राजकारणात सुद्धा तितकीच गती आल्याचे दिसत आहे.
गोकुळ चे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी आपल्या ठरावांची जुळणा केल्याचे समजत आहे. ते तालुक्यातून जनसुराज्य पक्षाच्या कोट्यातून संचालक झाले होते. त्यानंतर जनसुराज्य मध्ये अनेक कुरबुरी दिसून आल्या. कारण कर्णसिंह हे कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. परंतु तसे असताना देखील त्यांनी विधानसभेच्या काळात महाविकास आघाडीला बगल दिली, आणि भाजप चे निकटवर्तीय असलेले डॉ. विनय कोरे यांना जाहीर मंचावरून सहकार्य केले. हि गोष्ट विसरता येत नाही. अनेक जन म्हणतात त्यांच्याकडे माणसे कुठे आहेत? हा प्रश अगदी तकलादू आहे. आजही स्व. आमदार संजय दादांवर प्रेम करणारी मंडळी तालुक्यात आहेत, हे विसरता येणार नाही. तरीदेखील हळव्या मनाच्या या नेत्याने इतरांची तोंडे बंद करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
हे जरी खरे असले तरी गोकुळ च्या संचालक पदासाठी अनेक मंडळी जनसुराज्य मध्ये गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. भविष्यात या पदासाठी दुसऱ्या पक्षात उडी मारायला देखील अनेक मंडळी मागेपुढे पाहणार नाहीत. असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
कर्णसिंह गायकवाड हे गोकुळ चे संचालक असून भविष्यात त्यांचा या पदासाठी आग्रह असणार आहे.पश्चिम भागात असलेली दिग्गज मंडळी यासाठी स्पर्धक होवू शकतात. यासाठी जनसुराज्य चे नेते आमदार डॉ. विनय कोरे नेमका यावर काय तोडगा काढणार ? हा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. यावर योग्य पर्याय न निघाल्यास पक्षातून कोण बाहेर जाणार कि, इच्छा मारून गप्प बसणार, हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

असो, गोकुळ चे चित्र लवकरच स्पष्ट होईल. हे जरी खरे असले तरी, महाविकास आघाडी च्या माध्यमातून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची तयारी दुर्लक्षित करता येणार नाही. त्यांच्या मातोश्री सौ अरुंधती बाबासाहेब पाटील यांनीसुद्धा एक पंचवार्षिक गोकुळ मध्ये संचालक पद भूषविले आहे. ते आमदार सतेज पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच महाविकास आघाडीचे निष्ठावंत नेते आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांच्याकडून त्यांची मागणी झाल्यास आश्चर्य वाटू नये. तसेच कर्णसिंह गायकवाड यांनी जनसुराज्य मध्ये प्रवेश केल्याने तालुक्यातील कॉंग्रेस ला घरघर लागली आहे. माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या माध्यमातून तालुक्यातील कार्यकर्ते सांभाळून ठेवण्यास त्यांची मदत होईल,असा कयास सुद्धा नाकारता येत नाही. असो तालुक्यातील समीकरणे या घडामोडींमुळे बदलणार हे मात्र निश्चित.
