सामाजिक

यंदा मात्र वरुणराजाची शेतकऱ्यावर मेहेरनजर

बांबवडे : यंदा झालेला पाउस हा शेतीसाठी पूरक असल्याने शाहुवाडी तालुक्यातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. हा पावसाळा जीरवणीचा असून, यामुळे तालुक्यात तसेच जिल्ह्यात पावसामुळे नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.

यंदाच्या पावसामुळे एकदाही कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला नाही. किंवा पिके पाण्याखाली गेलेली नाहीत. या मुळे तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव भरण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाई आतापुरती तरी दूर झाल्याचे दिसत आहे. यामुळे भात पिके, सोयाबीन, भुईमुग, रताळी, नाचना आदी पिकांना जीवदान मिळाले आहे.

हे जरी खरे असले, तरी वन्य प्राण्यांमुळे मात्र शेतकरी हैराण झाला आहे. डुकरे, गवे या प्राण्यांनी शेतीची धूळदान केल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत वनविभाग मात्र मुग गिळून गप्प आहे. याचबरोबर शेतकरी वर्गाचे दुय्यम उत्पन्न समजले जाणारे शेळी, मेंढी पालन व्यवसाय बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यामुळे अडचणीत आले आहे. दररोज कुठून तरी एक बातमी येतेच कि, बिबट्याने शेळी मारली, कुत्रे मारले. या घटनांमुळे  शेतकरी भयभीत झाला आहे. बांबवडे सारख्या गजबजलेल्या गावात बिबट्या दिवसा हजेरी लावून आपले भक्ष्य पळवीत असेल, तर शेतकऱ्याने शेतातील कामे करायची कशी ? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे. वनविभाग याबाबत नेमकी काय पावले उचलतेय याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. एकंदरीत वरुणराजाने  मात्र शेतकऱ्यावर मेहेरनजर केली, हे मात्र खरे आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!