ठमकेवाडी ते बांबवडे रस्ता नुतनीकरण झाल्याने समाधान
बांबवडे ;शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील कोल्हापूर – रत्नागिरी हायवे रस्ता सुस्थितीत झाला असून, यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गतवर्षी ऑक्टोबर २०२५ या महिन्यात ग्रामपंचायत बांबवडे ने याविषयी आवाज उठवला होता. त्यावेळी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती. याचा त्रास प्रामुख्याने दुचाकी स्वारांना होत होता. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने दुचाकी स्वारांचा अपघात होत होता. त्यामध्ये दुचाकींचे नुकसान होत होते. तसेच अनेकांचे अपघात झाल्याने गंभीर जखमी देखील झाले होते. या अनुषंगाने ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने सरपंच भगतसिंग चौगुले तसेच सर्व सदस्यांनी याविषयी रस्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने रस्ता सुस्थितीत करून देण्याचे अभिवचन देण्यात आले होते.
ठमकेवाडी – ते बांबवडे येथील अंबीरा पूल यामधील रस्ता खूपच खराब झाला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेले अभिवचन आता सत्यात उतरताना दिसत आहे. कोल्हापूर – रत्नागिरी हायवे चा भाग असलेला हा रस्ता सध्या खूप चांगला झाला असून, रस्त्यावरील खड्ड्यांच्या आठवणी देखील पुसून गेल्याचे निदर्शनास येत आहे. याबद्दल प्रशासनाचे बांबवडे ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पंचायत समिती सदस्य अभयसिंह चौगुले यांनी देखील या रस्त्याबाबत समाधान व्यक्त केल्याचे एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
