मुख्याध्यापक पदाच्या वादात जाखले हायस्कुल ला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
कोडोली प्रतिनिधी:-
कर्मवीर भाऊराव पाटलांनी देशाचा युवक आदर्शवत आणि सुशिक्षित व्हावा, म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. विद्यार्थ्यांना आपले पाल्य समजून त्यांच्यासाठी उभे आयुष्य वेचले, आणि ग्रामीण भागातील युवकांना सुशिक्षित केले. असा ऐतिहासिक वारसा असणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात। दोन संस्थाचालक गट आणि शिक्षक यांच्या वादात, आणि ऐन पावसाळ्यात शाळेबाहेर बसून ज्ञानार्जन करण्याची वेळ जाखले ता.पन्हाळा येथील जाखले हायस्कुलच्या विद्यार्थ्यावर आली आहे. मावळते मुख्याध्यापक श्री नाईक हे ३० मे २०१७ रोजी सेवानिवृत्त झाले असून, नवीन मुख्याध्यापकांचा नेमणुकीच्या वादात आज काही संस्थाचालक आणि ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे.यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसण्याची वेळ आली आहे. उद्या १० वी च्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल असून, देखील शाळेला टाळे ठोकले आहे.
जाखले इथं गोपालेशवर शिक्षण संस्थेचे हायस्कुल आहे. दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांनी हि संस्था १९८२ साली स्थापन केली होती. जाखले हायस्कुल जाखले, या नावाने कार्यान्वित असलेल्या या हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री नाईक हे दिनांक ३० मे रोजी सेवानिवृत्त झालेत. दरम्यान नवीन मुख्याध्यापक नियुक्तीसाठी संचालक मंडळाने एस.पी.भोसले यांचे नाव ८ संचालकांपैकी ६ जणांनी श्री भोसले यांचे नाव सुचविले आहे,
तर सेवा जेष्ठतेनुसार भोसले पात्र आहेत, असे श्री भोसले याचे मत आहे.
जुन्या संचालक मंडळातील २ संचालकांनी एन.के. हुजरे यांचे नाव सुचविले. या दोघापैकी कोणाला मुख्याद्यापक नियुक्त करायचे यासाठी वाद सुरु आहे. भोसले समर्थकांचा म्हणणे आहे कि, त्यांच्या नियुक्तीसाठी शिक्षण अधिकारी जिल्हापरिषद यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे त्यांनाच मुख्याध्यापक करावे, आणि या मागणीसाठी त्यांनी आज शाळेला टाळे ठोकले आहे. एकूणच या सर्व प्रकारात विद्यार्थ्याचे मात्र हाल होत आहेत. ग्रामस्थांतून मात्र हा शिक्षणाचा बाजार थांबवा, अशी मागणी होत आहे.