शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी दि.४ मे च्या मोर्चात सहभागी व्हा : सागर संभू शेटे
बांबवडे : पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा दबावगट तयार करून , शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चंग बांधला आहे. त्यासाठी दि.४ मे रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन स्वाभिमानी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व संपर्कप्रमुख सागर संभू शेटे यांनी केले आहे.
शेतकरी कर्जमुक्ती जनजागृती मोटरसायकल रॅली सरूड इथं आली असता, शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात संभू शेटे बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, सत्तेच्या मस्तीत असलेल्या राज्यसरकारने राज्यातील शेतकऱ्यांकडे पूर्णतःदुर्लक्ष केले आहे. ऊसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली असताना, पिकाऊ मालाला रास्त भावसुद्धा मिळत नाही. परिणामी शेतकरी उध्वस्त होवू लागला आहे. असेही सागर संभू शेटे यावेळी म्हणाले.
यावेळी रॅली सोबत राधानगरी पंचायत समिती चे उपसभापती अजित पवार , जयसिंगपूर चे नगरसेवक शैलेश चौगुले, शाहुवाडी स्वाभिमानी पक्षाध्यक्ष वसंत पाटील , रायसिंग पाटील ,संतोष पाटील , सुरेश म्हाऊटकर, शामराव सोमोशी यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.