खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत संप
बांबवडे : आजपासून सर्व कृषी सेवा केंद्र विविध मागण्यांसाठी संपावर जात आहेत.
ऐन खरीप हंगामात कृषी सेवा केंद्र चालकांनी केलेला संप शेतकऱ्यांना अडचणीत टाकत आहेत.
कृषी सेवा केंद्र चालकांनी सारथी पोर्टल बंद करावे, तसेच खताबाबत लिंकिंग ला केंद्र चालकांचा कडाडून विरोध आहे. गेली दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या प्रशासनाने पूर्ण कराव्यात. लिंकिंग मुळे शेतकरी आणि दुकानदार यांच्यामध्ये वादावादी चे प्रसंग सातत्याने होत आहेत. शेतकऱ्यांसाठी येणारे बियाणे सुटे न देता पूर्ण बॅग द्यावी, असे या पोर्टल मुळे होत आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांची शेती एकरातून गुंठ्यात आली आहे. त्यामुळे पूर्ण बॅग घेणे म्हणजे शेतकऱ्याच्या माथ्यावर गरजेपेक्षा अधिक बियाणे लादण्यासारखे आहे. यामुळे शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे. तसेच कंपनीकडून आलेल्या बियाणांचे अवैध सँपल मुळे बियाणे खराब लागल्यास विक्रेत्याला आरोपी करणे चुकीचे आहे. विक्रेत्याला साक्षीदार म्हणून समजावे, अशा विविध मागण्यांसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रे आजपासून बेमुदत संपावर जात आहेत.

यावर प्रशासन नेमके काय बोलणार आहे, तसेच या विक्रेत्यांच्या मागण्या मान्य होणार का? असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. कारण खरीप पिकांचा हंगाम तोंडावर आला असून, मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून आपला पेरा करतो. परंतु अजून बियाणेच उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावर प्रशासनाने त्वरित तोडगा काढावा, अन्यथा शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडेल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
