” गावच्या वेशी कचऱ्याच्या ढिगांनी सजल्या, आणि दुर्गंधी ने बहरल्या “
बांबवडे : शाहुवाडी गावाला तालुक्याचा दर्जा प्राप्त आहे. परंतु या गावाच्या सुरुवातीलाच कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळतात. याचे दर्शन प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहुदा होत नसावे.
गावाच्या वेशीवरच दुतर्फा कचऱ्याचे कोंडाळे आणि दुर्गंधी असे स्वागत तालुक्याच्या गावाने करावे, हे अशोभनीय आहे. तसेच रस्त्याच्या एका बाजूला स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी म्हणजे एक पवित्र ठिकाण असते. ज्या ठिकाणी प्रत्येकजण जगाचा शेवटचा निरोप घेतो. असा परिसर एवढा गालिच्छ का ? एवढा दुर्गंधीयुक्त का ? हा एक प्रश्नच आहे. यावर कोणताही शासकीय अधिकारी कधीच काही बोलत नाही. केवळ हे एकच गाव नाही. बहुदा अनेक गावांच्या वेशी कचरा कोंडाळा झालेल्या दिसतात.
एक काळ होता, ज्यावेळी निर्मल ग्राम योजना अभियान शाहुवाडी तालुक्यात राबविण्यात आले होते. त्यावेळचे धडाडी चे गट विकास अधिकारी श्री ओमराज गहाणे यांनी गुड मॉर्निंग पथक तयार करून रस्त्याच्या दुतर्फा शौचाला बसणाऱ्यांची झोप उडवली होती. त्यावेळचे ग्रामसेवक मंडळींनी देखील आपले सर्वस्वी योगदान या अभियानात समर्पित केले होते. कोणत्या गावाला बक्षीस मिळाले कि, नाही ,हि गोष्ट अलाहिदा आहे. परंतु अधिकारी आणि जनता यांनी मिळून अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढत तालुक्याला नवं रूप प्राप्त करून दिलं होतं. यामध्ये बांबवडे चे ग्रामसेवक स्व. विजय पाटील यांनी मोलाचा वाट उचलला होता.
सध्याच्या अधिकाऱ्यांनी देखील अशीच स्वच्छतेची अभिनव योजना राबवीत गावाच्या वेशी कचरा कोंडाळा विरहित कराव्यात, अशीच सर्व सामान्यांची अपेक्षा आहे.
