शासनाच्या दुर्लक्षामुळेच अनेक भोंदूबाबा प्रकट होताहेत
बांबवडे : पुरोगामी महाराष्ट्रात भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत आहे. या अगोदर केवळ जनता बाबा, आणि भोंदुगिरी करणाऱ्यांच्या मागे लागायची. परंतु सद्यस्थितीत लोकप्रतिनिधी यांच्यासह अधिकारी वर्ग सुद्धा या भोंदू बाबाच्या मागे लागल्याने आश्चर्य वाटत आहे. एकीकडे धर्म, पंथ या नावाने व्होट बँक तयार करीत असताना,पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने भोंदुगिरी करणारे शासकीय जागेसह सर्व सामन्यांच्या जागा बळकावून गब्बर होवू पाहत आहेत. हे सर्व फक्त भोंदू बाबा एकटा करणे, शक्य नाही. त्याला कोणाचीतरी मदत असल्याशिवाय हे घडू शकत नाही.


सध्या राज्यात सगळीकडे भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत आहे. उप मुख्यमंत्री यांच्या सह अनेक आमदार ,अधिकारी सुद्धा या बाबांच्या चक्रव्युहात अडकणे, म्हणजे महाराष्ट्राचे केवढे नुकसान आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कायदा निर्माण करून तो पाळण्याऐवजी स्वत:च त्या बाबांच्या मागे लागणे, म्हणजे जनतेची केलेली दिशाभूल आहे. मोठ्या पदावर असलेली मंडळी सुद्धा असल्या बाबांच्या मागे लागतात, हे समाजासाठी हानिकारक आहे. याच अधिकाऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या कार्य् कर्तुत्वावर महाराष्ट्राने विश्वास ठेवायचा कसा? त्यतल्या त्यात त्या लोकप्रतिनिधी महिला असतील, तर करायचे काय ? असा प्रश्न उभा राहतो.
संबंधित त्या महिलेला आपण ज्या बाबावर विश्वास ठेवतो, तो महिलांवर अत्याचार करतोय ,हे माहित नव्हते काय ?, कि माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अशा लोकांना केवळ पदच्युत करून भागणार नाही, तर त्यांच्यावर देखील गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. कारण त्यांना माहित असूनही अशी प्रकरणे पोलीस खात्यापासुन लपविणे, हा सुद्धा एक गुन्हा नाही का ? त्या भोंदू अशोक खरात ने एवढी पैशाची माया गोळा केली. त्यावेळी इडी खाते नेमके काय करत होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी या इडी ने कहर केला होता. अनेक लोकप्रतिनिधींना बेनामी पैशासंबंधी पोलीस कोठडी दाखवली होती. मग आत्ता हे खाते नेमके काय करतेय ?आज महाराष्ट्रात अनेक बाबा लोक प्रकट होवू लागले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती शासकीय मालमत्तेवर आर्थिक अतिक्रमण करून सुधारली आहे. हे इडी ला कळले कसे नाही. कि जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष केले गेले, हा विषय संशोधनाचा आहे. सध्या प्रकट होत असलेल्या अनेक बाबांना शासकीय बाबूंनी मदत केल्यामुळेच त्यांच्याकडे एवढी संपत्ती जमा झाली. काही जणांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले, तरी त्यांच्याकडे शासनाचे लक्ष नाही.
एकंदरीत काय पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या आणि पंथाच्या नावाखाली अनेक बाबांचे साम्राज्य उभे राहू लागले आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.
