चरण थेरगाव रस्त्यावर उड्डाण पूल होण्यासाठी प्रयत्नशील -श्री रणवीरसिंग गायकवाड.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून जाणारा रत्नागिरी-नागपूर हाय वे रस्त्याला चरण थेरगाव रस्ता आडवा जात आहे. त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा, अशी मागणी या पंचक्रोशीतील नागरीकातून होत आहे. तशा आशयाचे निवेदन केडीसीसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांना देण्यात आले, त्या अनुषंगाने हा पूल होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, श्री रणवीरसिंग गायकवाड यांनी दिली.
शाहुवाडी तालुक्यातील चरण,सैदापूर, थेरगाव, बच्चे सावर्डे, आदी गावांनी हि मागणी लावून धरली आहे. कारण हा रस्ता शाहुवाडी, पन्हाळा, शिराळा अशा तीन तालुक्यांना पर्यायाने दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे, शिराळा तालुक्यातील मांगले आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली सारख्या मुख्य बाजारपेठांना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक सुद्धा अधिक आहे. असा रस्ता जर जोड रस्ता झाला, तर हानिकारक आहे. त्यासाठी त्याठिकाणी उड्डाण पूल झाल्यास वाहतूक सुद्धा जोमाने होईल, आणि या बाजारपेठांचा नावलौकिक आणि व्यापार वाढेल. या हेतूने उड्डाण पुलाची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान सदरच्या मागणी साठी मी सर्वच स्तरावार आपल्यासोबत असेन, अशी ग्वाही श्री रणवीरसिंग गायकवाड यांनी दिली.
यावेळी बांबवडे चा अंबीरा ओढा सरूड च्या दिशेने जाताना चिंचोळा आणि कमी खोलीचा झाला आहे. याची खोली वाढविली नाही तर पुन्हा एकदा बांबवडे बाजार पेठेत पावसाळ्यात पाणी घुसल्याशिवाय राहणार नाही. यासाठी संबंधित ठेकेदाराने अंबीरा ओढ्याची खोली उथळ न ठेवता खोल करावी, आणि पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा, अशी मागणी बांबवडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. यावेळी संबंधित ठेकेदाराने या महिन्या अखेरपर्यंत त्याची खोली वाढविण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान ठमकेवाडी इथ गावात जाण्यासाठी मार्ग करून द्यावा, अशी मागणी श्री ठमके साहेब, व गोगवे ग्रामपंचायत सदस्य सागर माने यांनी केली आहे. याबाबत सुद्धा सकारात्मक पर्याय काढण्याचे आश्वासन ठेकेदार श्री कडू यांनी दिले आहे.
यावेळी डोणोली, भाडळे, वाडी चरण आदी गावांच्या सुद्धा समस्या मांडण्यात आल्या.
दरम्यान श्री रणवीरसिंग गायकवाड यांनी ठेकेदाराला समक्ष घेवून विचारले असता, बऱ्याच प्रश्नांवर सकारात्मक पर्याय निघाले. काही ठिकाणी मंजुरी आणि फंड याचा विचार करून मार्ग काढण्यात येईल. असे श्री रणवीरसिंग गायकवाड यांनी सांगितले. सरते शेवटी मी वेळ पडल्यास ग्रामस्थांच्या बाजूने रस्त्यावर देखील उतरणार असा शब्द श्री रणवीरसिंग यांनी उपस्थितांना दिला.

यावेळी उड्डाण पूल कृती समिती चे मान्यवर श्री रवींद्र पाटील, अनिल पाटील, पांडुरंग घाटगे, रायसिंग पाटील सुनील पाटील, प्रताप पाटील, मुकुंद पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
