थेरगाव इथं डांबरीकरण करून द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन-छेद रस्त्यावर चौथा अपघात
बांबवडे : थेरगाव तालुका शाहुवाडी येथील रत्नागिरी – नागपूर हायवे छेद रस्त्यावर चारचाकी वाहनाने दुचाकी क्र. एम.एच.०९ -ईओ-२०५५ ला ठोकर मारल्याने अपघात झाला आहे. दुचाकी स्वाराला खुटाळवाडी येथील पाटील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान सदर चा अपघात नवीन हायवे व जुना थेरगाव रस्त्यावर झाला आहे. याबाबत दोन आठवड्यांपूर्वी उड्डाण पूल कृती समिती ने प्रशासनाला तसेच केडीसिसी बँकेचे संचालक रणवीरसिंग गायकवाड तसेच जि.प.सदस्या राजकुंवर गायकवाड यांना उड्डाण पूल तसेच रस्त्यावरील भराव काढून घेवून त्यावर डांबरीकरण करणे संदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी जुन्या रस्त्यावर टाकलेला भाराव काढून घेवून त्यावर डांबरीकरण करून देवू असा शब्द ठेकेदार कडू यांनी कृती समिती ला दिला होता. परंतु ठेकेदार कडू यांनी आपला शब्द पाळला नाही. यामुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा तिथे जमलेल्या ग्रामस्थांमधून ऐकावयास मिळत होती.
तसेच या अगोदर चार अपघात या घटनास्थळावर झाले आहेत. यामुळे प्रशासन माणसे मरण्याची वाट पहात आहे काय ?असा संतप्त सवाल सुद्धा जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
दरम्यान प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी या बाबत गांभीर्याने विचार करून तत्काळ पावले उचलावीत. सद्यस्थितीत जुन्या रस्त्यावरील भराव काढून त्यावर डांबरीकरण करून देतो असे सांगितलेल्या कडू यांनी तत्काळ डांबरीकरण करून द्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असे कृती समिती चे रवी पाटील यांनी सांगितले.
