भारतमाते तुझ्या रक्षणा, किती हवेत हिरे, छत्रपतींच्या भूमीतून येतील थवेच्या थवे….
बांबवडे : भारतमाते तुझ्या रक्षणा, किती हवेत हिरे, छत्रपतींच्या भूमीतून येतील थवेच्या थवे….
हे सगळं जरी खर असलं तरी ,इतिहास साक्ष आहे, मरून कधीही लढाई जिंकता येत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. एवढास देश ज्याचा जन्म आमच्यामुळे झालांय, असा देश बापालाच भारी पडायला लागलांय. याला काय म्हणवं ,आमची वीरता कि,राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा आम्ही दिलेला बळी. आजवर किती जवान या एवढ्यांशा देशापायी शहीद झालेत, याची मोजदाद नाही , तेही आपली काही चूक नसताना. आपण एका कुलभूषण जाधव यांना सोडवून आणू शकत नाही? हेच आपल दुर्दैव. जगाचा इतिहास पाहता अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच अमेरिकेने त्यांच्या संशयित देशांवर आक्रमण केलीत. तिथला प्रदेश भुईसपाट केला. रशिया ने केलेले सिरीया वरचे आक्रमण. अशी अनेक उदाहरणे आहेत कि, ज्यांनी आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात त्या संपूर्ण देशाला गुढघे टेकायला लावलेत. मग आम्ही गप्प का? असतील काही राजनैतिक धोरणे. पण तुमच्या या धोरणापायी किती सैनिकांचे बळी देणार आहत.? मोदी शासने केलेला सर्जिकल स्ट्राईक हा केवळ स्टंट च ठरला का ?
शासनाची देशाच्या सुरक्षेची नक्की धोरणं तरी काय आहेत ? आज आपल्या हद्दीत ६०० मीटर पर्यंत पाकिस्तानचे बॉर्डर अॅक्शन टीम येते. अशावेळी आपले जवान आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतातंच. परंतु त्यांच्यावर हि वेळंच का येते? आजपर्यंत आपण किती देशांच्या सीमेच्या आत अतिक्रमण केले आहे? याचे उत्तर नाही, असेच येईल. कारण आपण अशा हरकती करतंच नाही. म्हणून आपण आपले जवान गमावतो आहोत का ? कि, शेजारच्या या राष्ट्रांना त्यांची जागा दाखवण्याची पुन्हा एकदा वेळ आलीय.
केंद्रात कोणते शासन कार्यरत आहे, राज्यात कोणते शासन कार्यरत आहे, हा प्रश्न अलाहिदा आहे. पण जर कोण नेहमीच आपल्याला वेडावून दाखवणार असेल, आमच्या जवानांना त्यासाठी हौतात्म्य पत्कराव लागणार असेल, तर हे कितपत योग्य आहे ? आपल्या देशाला लढाऊ परंपरा आहे. याचा अर्थ आम्ही आमचे जवान त्यांच्यावरून ओवाळून टाकण्यासाठी सीमेवर लढत आहेत का? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. राजकारण, आंतरराष्ट्रीय धोरणं, जर आमच्या सुरक्षेच्या आड येणार असतील, तर ती झुगारूनच दिली पाहिजेत, कारण आपण कधी विनाकारण कोणत्या शेजारच्या राष्ट्रात लुडबुड केलेली नाही.
आत या राष्ट्राला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलीय. त्यांच्या आर्थिक नाड्या दाबण्याची वेळ आली आहे. आणि गरजेनुसार आक्रमणाची वेळ आली आहे.
जय जवान, जय किसान….
जय हिंद !!!